मूल्यमापन / मूल्यांकन पद्धती

सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन (५ वी ते ८ वी )

नवीन शैक्षणिक धोरणानुसार आकारिक मूल्यमापन पध्दत इयत्ता ५ वी ते ८ वी वर्गांसाठी वापरली जाते. संकलित मूल्यमापन (लेखी परीक्षा ) व आकारिक मूल्यमापन (विविध आकारिक साधने ) या पद्धतीने विद्यार्थांचे मूल्यमापन होते आकारिक मूल्यमापनासाठी वर्गश: व विषयश: प्रकल्प, क्षेत्र भेट, तोंडी काम, प्रयोग, उपक्रम, स्वाध्याय अशा विविध साधनांचे नियोजन करुन त्याप्रमाणे नोंदी व कार्यवाही केली जाते. अंतीम निकाल श्रेणी पद्धतीने तयार केला जातो.

प्रात्यक्षिक परीक्षा :-

विज्ञान व गणित विषयाच्या मूल्यमापनासाठी प्रत्येक सत्रात या विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात.

लेखी परीक्षा :-

इयत्ता ५ वी ते ८ वी साठी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन योजनेनुसार लेखी (प्रथम सत्र / व्दितीय सत्र ) व मासिक चाचणी परीक्षा नियोजित केलेल्या असतात. तर इयत्ता ९ वी आणि १० वी साठी बोर्ड पद्धतीनुसार घटक चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा, व्दितीय सत्र परीक्षा अशा वर्षा भरातील परीक्षांचे नेमके व निश्चित नियोजन केलेले असते.

गृहपाठ व वर्गपाठ :-

विद्यार्थ्यांचे मूल्यमापन अधिक योग्य व्हावे. लेखन कौशल्याचा विकास व्हावा यासाठी दर महा गृहपाठ व दैनंदिन वर्गपाठ रचना केलेली आहे. नाविन्यपूर्ण गृहपाठ दिले जावेत यासाठी प्रोत्साहन दिले जाते. शालेय वेळेतच शिक्षकांच्या उपस्थितीत हे गृहपाठ करून घेतले जातात.

तोंडी परीक्षा :-

भाषा विषयाच्या श्रवण व भाषण क्षमतांचे योग्य मूल्यमापन व्हावे यासाठी भाषा विषयाच्या तोंडी परीक्षांचे नियोजन केलेले असते. ज्याव्दारे श्रवण, भाषण, वाचन, श्रुतलेखन कौशल्यांचे मूल्यमापन केले जाते.

प्रकल्प व उपक्रम :-

आकारिक मूल्यमापन पद्धतीनुसार आपल्या विषयाचे अध्यापन, मूल्यमापन अधिक परिपूर्ण व्हावे यासाठी वर्गश:, विषयश: विविध प्रकल्प व उपक्रमांचे नियोजन केले जाते. आकारिक मूल्यमापनाची साधने म्हणून प्रकल्प व उपक्रम या साधनांच उपयोग केल्या जातो.

मित्र-जोडीदार योजना :-

ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक गती आहे अशा विद्यार्थांनी अभ्यासत कमी गती असणारे विद्यार्थी जोडले जातात. अशा जोडीदार योजनेमुळे कमी गती असणाऱ्या विद्यार्थ्यांचा पायाभूत अभ्यास अधिक पक्का होतो व समवयस्क मित्राकडून तो अधिक चांगल्या प्रकारे अध्ययन करतो तर अभ्यासात गती असणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास मित्राची तयारी करून घेतल्यामुळे अधिक चांगला होतो त्याची अध्ययन कौशल्ये विकसित होतात.

ज्ञानरचनावादी दृष्टिकोन :-

शिक्षणक्षेत्रातील आधुनिक विचारांचा ज्ञानरचानावादी दृष्टिकोन’ या विचाराचा अभ्यास करून अध्यापन केले जाते. विद्यार्थी हेच ज्ञान निर्माते आहेत. अध्यापक हे सहाय्यक, मार्गदर्शक आहेत ही भूमिका लक्षात घेऊन अध्यापन केले जाते. त्यासाठी विविध अध्ययन अध्यापन कृतीची रचना केली जाते.